मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ह्या मराठी कॉमेडी शोमधील महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. ह्या दोघांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. मात्र, या जोडीतील विशाखा सुभेदार हिने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा शो सोडण्याच्या निर्णय घेऊन प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. विशाखाने फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये एक निर्णय असे सांगत विशाखा म्हणाली, “नमस्कार मंडळी..अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅटमध्ये काम करतेय. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! २०११ मध्ये पहिलं पर्व विजेता जोडी,मांगले आणि मी.. ते आज २०२२ समीर विशाखा..असा मोठा प्रवास आहे. हा प्रवास खरंच सोपा नाहीये. मी काही फार मोठी विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे, ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिकपणे केलं. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करतं, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं. प्रत्येक स्किट मी जगले. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. ‘Wet-cloud productions’च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आत्ता ह्याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले.”

पुढे विशाखा म्हणाली, “सातत्याने त्यांच्या सोबत काम करतेय..! आणि ह्या फॉरमॅटमध्ये ही एक फेरी हिंदी कॉमेडीमध्ये ही मारून आले..! दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेन्शन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगल करायचं, त्या टेन्शन मधून काहीकाळ बाहेर पडतेय..! (अजून दोन तीन एपिसोड दिसेन shoot झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली २०/२५ दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक ५०० ते १ हजार प्रयोगाची किंवा मग सीरियल मधली असो, मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..! इथलाही प्रवास खडतरच असतो, सोपा नाहीच तो. पण ना, इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो, त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारातगोंजारात, तिला वेळ देऊन, तिच्यासोबत खेळता येत, शांत चित्ताने दिग्दर्शकाचा “ओके” हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत.”

“आत्ता हे ‘असं’ काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे..! रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरच मनापासून आभार. हास्य जत्रेने मला खुप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत.. जत्रेतल्या माझ्यावर भरभरून पत्र/ लेख लिहिलीत, कविता केल्यात..माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलात, त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवंत समजते. तुम्ही जसं हास्यजत्रे वर प्रेम केलंत तसच मी ही खुप प्रेम केलं, करतेय आणि करेन. जीव ओतून काम केलं..! प्रत्येक स्किट नंतर गोस्वामी काय म्हणतील ह्यासाठी कानाचे द्रोण ही केले..! त्यात कधी यश आल आणि कधी नाही..! प्रयत्न करत राहिले पण आत्ता थोडी धावपळ होतेय. मला खरंच अभिमान आहे कीं मी ह्या जत्रेचा भाग झाले.. आणि हा भाव मनात आयुष्यभर राहील,” असं विशाखा म्हणाली.

पुढे विशाखाने सगळ्या कलाकारांचे आभार मानले. ती म्हणाली, “माझ्या या हास्य प्रवासात समीरने महत्वाची साथ दिली, त्यामुळे त्याचे आभार. तुझ्यातल्या वेडेपणाला सलाम आहे. या कार्यक्रमाने खूप माणसं जोडली गेली. पण भाकरी भाजली की टोपलीत काढावी, आंबे तयार झाले तर उतरवावेत तसेच हा प्रवास थांबवून नवं बी पेरण्याची गरज आहे. मला काही मोठं काम मिळालं नाहीय किंवा मी दुसरी मालिका करत नाही किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…! आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता “असं म्हणण्यापेक्षा. “अर्रर्रर्रर्र “हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! फक्त आता वेगळ्या धाटणीचे काही करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या भूमिकेतून भेटू,” असे म्हणतं विशाखाने सगळ्यांचा निरोप घेतला.