महाराष्ट्रात पुन्हा मौसम मस्ताना…! राज्यातील ‘या’ भागात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज
Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील जळगाव, पुणे, नाशिक समवेतच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात सकाळच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून आता गारवा वाढला आहे. मात्र असे असले तरी दुपारचे कमाल तापमान अजूनही सरासरी एवढेच आहे.
यामुळे मात्र दिवसा काही ठिकाणी उन्हाचे चटके देखील बसत आहेत. दरम्यान या समिश्र वातावरणात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर सध्या स्थितीला आपल्या राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. जळगावमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.
जळगाव हे महाबळेश्वर पेक्षा थंड ठिकाण ठरत आहे. शुक्रवारी जळगाव मधील तापमान महाबळेश्वर पेक्षा कमी होते. शुक्रवारी पुण्याचे तापमान देखील जम्मू-काश्मीर पेक्षा कमी होते. यामुळे आता महाराष्ट्रात हळूहळू थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडी जोर पकडणार आहे. 15 नोव्हेंबर नंतर या वर्षी महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज काही तज्ञांनी वर्तवला आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने देशातील काही भागात 30 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
म्हणजेच देशातील काही भागांमध्ये उद्या आणि परवा पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज केरळ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, येनम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
30 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर तेथील पावसाचा जोर कमी होणार आहे. तसेच 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दक्षिण अंतर्गत कर्नाटकात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तुरळक वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पण देशातील उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात आता थंडीचा जोर वाढणार आहे. तर काही ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी पाऊस हजेरी लावणार आहे. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात सोमवारी आणि मंगळवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
30 ऑक्टोबर रोजी राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय 31 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग मध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट जारी झाला आहे. 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे.